वर्धा | प्रतिनिधी
पुणे येथे घडलेल्या विषारी दारूकांडात अनेकांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी संपूर्ण राज्यात अवैध गावठी दारू व बनावट मद्यनिर्मितीचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
या आदेशानुसार विभागीय उपआयुक्त गणेश पाटील (नागपूर विभाग) तसेच वर्धा जिल्ह्याचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वर्धा जिल्ह्यात धडक मोहीम राबविली आहे.
दिनांक २९ मे २०२६ पासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान गावठी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच बनावट मद्यनिर्मितीविरोधात व्यापक कारवाई करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक एम. ए. शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत एकूण २० गुन्हे नोंदविले असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे १०,१८० लिटर रसायन, ८ लिटर विदेशी मद्य आणि १९२ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ३५ हजार १५२ रुपये असल्याची माहिती विभागाने दिली.
या मोहिमेत दुय्यम निरीक्षक डी. वाय. राऊत, आर. यू. काष्टे तसेच जवान अमित नागमोते, योगेश गावंडे, गिरीष बावणे आणि सुजाता भारस्करे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अवैध मद्य व्यवसायाविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.










