हिंगणी | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वाढती वृक्षतोड, कमी होत चाललेले हरित क्षेत्र आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला. भविष्यात अशा उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
हिंगणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अतुल भोये व प्रशासक दामिनी डेकाटे यांच्या उपस्थितीत हिंगणी आणि धामणगाव परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात धामणगावचे पोलीस पाटील अमोल कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती बहादुरे, ग्रामपंचायत हिंगणीचे सहायक लिपिक शंकर बोरले, आरोग्य सेविका भारती जिवतोडे तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. पर्यावरणाचे रक्षण करून पुढील पिढ्यांना निरोगी, सुरक्षित आणि हरित भविष्य देण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला.










