पातूर (प्रतिनिधी):
पातूर तालुक्यातील सावरगाव येथील तांडा वस्तीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेली कमी विद्युत दाबाची (लो व्होल्टेज) समस्या अखेर मार्गी लागली आहे. यासोबतच पाडशिंगी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावरून जाणारी धोकादायक वीज वाहिनीही गावाबाहेरील शेतातून स्थलांतरित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या समस्या सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सावरगाव तांडा वस्तीतील नागरिकांना अनेक वर्षांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महावितरण विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. अखेर या मागणीची दखल घेत महावितरणने तांडा वस्तीसाठी नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांची दीर्घकालीन विजेची समस्या दूर झाली आहे.
दरम्यान, पाडशिंगी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावरून जाणारी उच्च दाबाची वीज वाहिनी भाविक व ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत होती. या प्रश्नाकडेही निलेश कापकर यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांनंतर महावितरण विभागाने संबंधित वीज वाहिनी मंदिर परिसरातून हटवून गावाबाहेरील शेतातून स्थलांतरित केली.
या दोन्ही विकासकामांमुळे सावरगाव आणि पाडशिंगी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर, महावितरण विभाग आणि संबंधित प्रशासनाचे आभार मानले आहेत.
प्रतिक्रिया :
“ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हीच माझी जबाबदारी आहे. हे यश संपूर्ण गावकऱ्यांच्या एकजुटीचे असून भविष्यातही जनहिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी कटिबद्ध राहणार आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी सांगितले.







