पातूर | प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील आलेगाव व परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी चोंढी येथील निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याची मागणी करत पाटबंधारे विभागाला निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पातूर तालुक्यातील चोंढी येथे असलेल्या निर्गुणा धरण मध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आलेगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, केवळ नागरिकच नव्हे तर पाळीव जनावरे आणि रानटी प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पशुधन आणि वन्यजीवांचेही हाल होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निर्गुणा धरणातील उपलब्ध पाणी कॅनॉलद्वारे सोडल्यास आलेगाव व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि बोअरवेलना पुन्हा पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांसह शेतकरी आणि पशुपालकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे निलेश कापकर यांनी म्हटले आहे.
या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पाटबंधारे विभागाने निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.









