कराड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचा वीर सुपुत्र Arjun Rajendra Jadhav (वय ३०) यांना जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुका आणि सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ अर्जुन जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. यावेळी अचानक झालेल्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत Vikram Chavan यांनाही वीरमरण आले.
अर्जुन जाधव हे सन २०१६-१७ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ते बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान असून सध्या ८ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटमध्ये कार्यरत होते. देशसेवेप्रती असलेली निष्ठा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.
२०२४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी Sayali Jadhav, एक वर्षाचा मुलगा Sarvesh Jadhav, वडील Rajendra Jadhav, आई Surekha Jadhav, भाऊ Rishikesh Jadhav तसेच विवाहित बहिणी Reshma Chavan आणि Poonam Patil असा परिवार आहे.
विशेष म्हणजे, २५ जून रोजी मुलगा सर्वेशचा पहिला वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी अर्जुन जाधव हे १५ जून रोजी सुट्टीवर घरी येणार होते. मात्र त्याआधीच नियतीने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जाधव कुटुंबाची देशसेवेची परंपरा कायम राहिली असून त्यांचे धाकटे बंधू ऋषिकेश जाधव भारतीय नौदलात कार्यरत आहेत. त्यामुळे या कुटुंबाचे राष्ट्रसेवेसाठी असलेले योगदान विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शहापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. “वीर जवान अमर रहे” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
अंत्यसंस्कार प्रसंगी Manoj Ghorpade, Atul Bhosale, Balasaheb Patil, Santosh Patil, Atul Mhetre, Omkar Kapale यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सैनिक आणि हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शहीद अर्जुन जाधव यांचे शौर्य, धैर्य आणि देशभक्तीचा आदर्श भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या बलिदानाचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला असून देश त्यांचे ऋणी राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद! 🇮🇳
