सातारा | प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार धोम डाव्या कालव्याचे सुरू असलेले आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय आदेशामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.
शेतकरी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची तरतूद राखूनही धोम धरणात शेती सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. मात्र, कालव्याखालील निम्म्याहून अधिक क्षेत्र अद्याप भिजवणे बाकी असताना आणि आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असतानाही कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे परिसरातील ऊस, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उभ्या पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊन पिके जळून जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
धोम जलाशयातील उपलब्ध पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सातारा येथील सिंचन भवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात धोम डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून शासनाने तातडीने निर्णय घेऊन सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी सर्व लाभधारकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, पाणी प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

