पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे रात्री वाहन चालविणे अधिक धोकादायक बनत असून, नियमबाह्य आणि अतितीव्र एलईडी हेडलाईटमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः पुणे-मुंबई महामार्ग, वाकड, हिंजवडी, भोसरी, तळवडे आणि चाकण परिसरातील रस्त्यांवर समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
शहरात वाहतूक नियमभंगाविरोधात विविध मोहिमा राबविल्या जात असल्या तरी नियमबाह्य एलईडी हेडलाईट्सकडेही लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
वाहनचालकांच्या मते, अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये कंपनीच्या मान्यतेशिवाय अतितीव्र एलईडी दिवे बसवले जात आहेत. रात्री समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडल्याने काही क्षणांसाठी रस्ता दिसेनासा होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, हाय-बीमचा अनावश्यक वापर आणि मॉडिफाइड एलईडी दिव्यांचा वापर हे रस्ते सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. अशा नियमबाह्य बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांनी वाहतूक विभागाकडे मागणी केली आहे की, ज्या पद्धतीने मॉडिफाइड सायलेंसर, फॅन्सी नंबर प्लेट आणि इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे अतितीव्र एलईडी हेडलाईट बसविणाऱ्या वाहनांवरही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनचालकांनी लो-बीमचा वापर करावा आणि नियमबाह्य एलईडी दिवे टाळावेत, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे. वेगाने विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते सुरक्षेसाठी नागरिक आणि प्रशासन या दोघांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.



