पातूर प्रतिनिधी : आलेगाव, नाथनगर आणि गोळेगाव या गावांना जोडणाऱ्या निर्गुणा नदीवर तातडीने पूल व जोडरस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रस्ते दुरुस्ती कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या
आलेगाव, नाथनगर व गोळेगाव परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी निर्गुणा नदीवरील हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सुरक्षित पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. तसेच शेतकरी व शेतमजुरांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मार्गावर पूल नसल्याने माळी समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना नदी पात्रातून जावे लागते. अंत्यविधीसारख्या संवेदनशील प्रसंगीही मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे निलेश कापकर यांनी सांगितले.
या पुलाच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बाळापूर आणि जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला असून सध्या प्रशासकीय मंजुरी व निधीची प्रतीक्षा आहे.
परिसरातील दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि शेती विकासासाठी हा पूल अत्यंत आवश्यक असल्याने शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
