अक्कलकोट प्रतिनिधी : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असले तरी विजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आळगे, शेगाव, अंकलगी, खानापूर व हिळ्ळी परिसरातील शेतकऱ्यांना दिवसातून केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही.
परिणामी ऊसासह अन्य उभी पिके वाळण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भीमा नदीत पाणी उपलब्ध असतानाही विजेअभावी त्याचा शेतीसाठी योग्य वापर करता येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे नदीपलीकडील कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने तेथील शेतकरी भीमा नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मर्यादित वीजपुरवठ्यामुळे उभी पिके वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पूर्वी आठ तास मिळणारा वीजपुरवठा प्रथम सहा तासांवर आणि आता केवळ दोन तासांवर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. उभी पिके वाचवण्यासाठी महावितरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याचा कालावधी वाढवावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
