आलेगाव-नाथनगर-गोळेगाव मार्गावरील पुलाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता
पातूर | प्रतिनिधी :
आलेगाव-नाथनगर-गोळेगाव मार्गावरील निर्गुणा नदीवरील पूल व जोडरस्त्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी शिफारस केली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे.
काही दिवसांपूर्वी निलेश कापकर यांनी निर्गुणा नदीमुळे परिसरातील ग्रामस्थांना होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधले होते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास आलेगाव, नाथनगर व गोळेगाव गावांचा संपर्क तुटत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांना वाहतुकीची अडचण तसेच शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर मंत्री आकाश फुंडकर यांनी १६ जून २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत पत्र पाठवून या कामाला तातडीने प्रशासकीय मंजुरी व निधी देण्याची विनंती केली आहे. संबंधित प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निर्देश द्यावेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हा पूल झाल्यास परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मंत्र्यांच्या या सकारात्मक शिफारशीमुळे ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
