कोल्हापूर | प्रतिनिधी
जून महिन्याचे पंधरा दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने कोल्हापूर शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागांत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले असून महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडून महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, महापालिकेकडे उपलब्ध असलेले अपुरे टँकर आणि चालकांअभावी वेळेवर पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सभेत नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला. “महापालिकेकडे चालक उपलब्ध नसतील, तर आम्ही स्वतःचे चालक आणून टँकर घेऊन जाऊ. त्यातून काही अपघात किंवा घटना घडल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मध्यरात्री काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी पाणीटँकर उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
