उदगीर | प्रतिनिधी
उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अडत दुकान हमाल आणि खरेदीदारांच्या मुनिमांमध्ये झालेल्या वादामुळे मागील चार दिवसांपासून बाजार बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी खरेदीदार व व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावून शेतकरी हिताला प्राधान्य देत कठोर इशारा दिला.
सभापती शिवाजीराव हुडे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असून शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. बाजार बंद राहिल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांचा शेतमाल आता अडत दुकानासमोर येणाऱ्या वाहनातच प्रतवारी करून त्याचा भाव निश्चित करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर माल थेट खरेदीदारांच्या दुकानात किंवा गोडाऊनमध्ये उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माल उतरवण्यासाठी लागणारे कडते, मात्रे आणि हमालीचा अतिरिक्त खर्च वाचणार असून व्यापाऱ्यांचाही वेळ वाचणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या बैठकीस सचिव प्रदीप पाटील, व्यापारी प्रतिनिधी जगदीश बाहेती, रवींद्र कोरे, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंढे, सचिव मुन्ना पेन्सलवार, कोषाध्यक्ष माऊली पंदिलवार, कल्पेश बाहेती, लक्ष्मीकांत चिकटवार, राजेश अंबरखाने, दत्ता बिरादार, मोहन हैबतपुरे, शिवलिंग हैबतपुरे, विष्णू अरदवाड, साईनाथ कोरे, नरसिंग चिमणचोडे, लक्ष्मीकांत रायवाड, राहुल मलगे, सूरज नावंदर यांच्यासह अनेक व्यापारी व खरेदीदार उपस्थित होते.
सभापती हुडे यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पाणी आता डोक्याच्या वर गेले आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही. आवश्यक असल्यास बाजार समिती कठोर निर्णय घेईल.”
