दापोली : केळशी गावासाठी मंजूर झालेली जलजीवन मिशन ‘हर घर जल’ पाणीपुरवठा योजना निधीअभावी गेल्या दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडल्याने ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. योजना तातडीने पूर्ण करून गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दापोली तहसीलदार कार्यालयासमोर केळशी ग्रामस्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन ‘हर घर जल’ अंतर्गत केळशी गावासाठी नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असले, तरी जवळपास दीड वर्षांपासून निधीअभावी योजना अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत शासन तसेच स्थानिक पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. योजना अपूर्ण राहिल्याचा थेट परिणाम यावर्षी केळशीतील नागरिकांना भोगावा लागला असून, एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. अखेर नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा आणि केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या उद्दिष्टाची केळशी गावात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
केळशीचे माजी उपसरपंच केदार विलास पतंगे यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत दापोली तहसीलदार कार्यालय तसेच संबंधित विभागाकडे लेखी पत्र सादर केले आहे. उपोषणाबाबतचे पत्र पंचायत समिती दापोलीच्या ग्रामपंचायत विभागालाही प्राप्त झाले असून, तक्रारीवर सविस्तर चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाच्या पत्रातून स्पष्ट होते.
पंचायत समितीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत केळशीच्या अधिकाऱ्यांना तक्रारीशी संबंधित कागदपत्रे व आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तहसीलदार कार्यालयासमोर होणाऱ्या एकदिवसीय उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. रखडलेली जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासन ठोस निर्णय घेणार का, तसेच केळशीकरांचा पाणीप्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.









