दोंडाईचा | प्रतिनिधी
दोंडाईचा शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त विद्यार्थी व पालकांनी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
दोंडाईचा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी दररोज एसटी बस सेवांवर अवलंबून असतात. मात्र, गेल्या वर्षभरात अनेक मार्गांवरील बस सेवा बंद करण्यात आल्याने तसेच काही बसेस शाळा व महाविद्यालयांच्या वेळांशी विसंगत वेळेत धावत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेषतः सोनशेलू, मेथी, वरझडी, देगाव, लोहगाव, कोळदे, कर्ले, रामी आणि खोकराळे या गावांतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे शक्य होत नसून काहींना तर प्रवासाची सुविधा नसल्याने शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईचा आगार व्यवस्थापनाकडे निवेदन सादर करून सर्व मार्गांवरील बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेनुसार बसचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर त्वरित निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, नगरसेवक कृष्णा नगराळे, जितेंद्र डी. गिरासे, संजोग रामोळे, संजय तावडे आदी पदाधिकाऱ्यांनी दोंडाईचा आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांना निवेदन दिले. तसेच निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, धुळे विभाग नियंत्रक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
