अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात मंजूर ४२ नियमित पदांपैकी केवळ १६ पदे भरलेली असून तब्बल २६ पदे रिक्त असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, लसीकरण तज्ज्ञ, परिचारिका, बालरोग परिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांसारखी अत्यावश्यक पदे अद्याप रिक्त असल्याने रुग्णालयाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी दक्षिण गडचिरोलीतील महिला व बालरुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार मंजूर ४२ नियमित पदांपैकी केवळ १० नियमित आणि ६ कंत्राटी अशी १६ पदे भरलेली आहेत. उर्वरित २६ पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ (गट-अ), भूलतज्ज्ञ (गट-अ), क्ष-किरण तज्ज्ञ, लसीकरण तज्ज्ञांची दोन्ही पदे, बालरोगतज्ज्ञांची दोन पदे, स्त्रीरोगतज्ज्ञांची दोन पदे, पाच परिचारिका, तीन बालरोग परिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, सहाय्यक अधिसेविका, औषधनिर्माता, प्रशासकीय अधिकारी, भांडारपाल आणि कनिष्ठ लिपिक या पदांचा समावेश आहे.
दरम्यान, बाह्यस्रोत (आउटसोर्सिंग) व्यवस्थेतील ५५ मंजूर पदांपैकी ४९ पदे भरली असून केवळ ६ पदे रिक्त आहेत. यात परिचारिका, बालरोग परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्षसेवक, शिपाई आणि बाह्यरुग्ण लिपिक यांसारख्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र क्ष-किरण तंत्रज्ञाची दोन, ईसीजी तंत्रज्ञाची एक आणि सफाईगाराची तीन पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांची व्यवस्था असली तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पदभरतीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
१३ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाची पाहणी करून रिक्त पदांचा आढावा घेतला होता. त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून आरोग्यसेवा सक्षम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर चार ते पाच महिने कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
दरम्यान, कायमस्वरूपी पदभरतीच्या मागणीसाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी आंदोलन छेडले. २९ जून रोजी आंदोलनासाठी रुग्णालयात पोहोचलेल्या मुक्कावार यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी ३० जूनपासून आमरण उपोषण सुरू केले.
या पार्श्वभूमीवर २९ जून २०२६ रोजी आरोग्य विभागाने उसनवारी (प्रतिनियुक्ती) तत्त्वावर सहा तज्ज्ञ डॉक्टरांची तात्पुरती नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले. त्यापैकी तीन डॉक्टरांची नियुक्ती १४ जुलैपर्यंत, तर उर्वरित तीन डॉक्टरांची नियुक्ती ३१ जुलै २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. या आदेशानुसार बालरोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा आणि भूलशास्त्र विभागासाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र ही व्यवस्था तात्पुरती असल्याने “३१ जुलैनंतर पुन्हा रुग्णांचे काय?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यातच आरोग्यमंत्र्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली असतानाही त्यावेळी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. आंदोलनानंतरच जूनअखेरीस प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
एकीकडे बाह्यस्रोतावरील कर्मचाऱ्यांची भरती करून दैनंदिन कामकाजाची व्यवस्था करण्यात आली असली, तरी उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि नियमित आस्थापनेतील रिक्त पदांच्या भरतीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तात्पुरत्या नियुक्त्यांऐवजी सर्व रिक्त पदांवर कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करून अहेरी महिला व बाल रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
