कन्नड | प्रतिनिधी :
चिंचोली लिंबाजी येथे स्थानिक प्रशासनाच्या कारभाराविरोधात आणि नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तात्याराव भुजंग यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.
तात्याराव भुजंग यांनी गावातील व परिसरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये चिंचोली लिंबाजी परिसरातील प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, शासकीय कामकाजातील दिरंगाई दूर करून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे तसेच पाणी, वीज आणि आरोग्य सेवांमधील त्रुटींवर कायमस्वरूपी तोडगा काढणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
उपोषणाला बसताना त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही अनेकदा निवेदने दिली, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळाली. जोपर्यंत आमच्या मागण्यांवर लेखी व ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांच्या या आंदोलनाला परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून उपोषण स्थळी नागरिकांची गर्दी वाढत आहे. स्थानिक प्रशासन या आंदोलनाबाबत पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
