सेलू (प्रतिनिधी) : वर्धा शहरातील चार मित्रांपैकी दोघांचा रिधोरा येथील पंचधारा धरणात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील ओम वरठी (वय ३८, रा. सावजी नगर), राकेश (वय ३४, रा. आदिवासी कॉलनी), प्रवीण हिवसे (रा. गजानन नगर) आणि चंदू मेश्राम (रा. सावजी नगर) हे चार मित्र रिधोरा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत ते आंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले.
पाण्याचा अंदाज न आल्याने ओम वरठी आणि राकेश हे दोघे खोल पाण्यात बुडाले. मित्रांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर रिधोरा गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवून दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. नागरिकांनी धरण, तलाव किंवा नदी परिसरात निष्काळजीपणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
