रायगड / प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने २ ते ५ जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण आणि गोवा परिसरासाठी अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहणे, सखल भागात पाणी साचणे, भूस्खलन होणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः डोंगराळ भागातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
रायगड जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पूरग्रस्त किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
