गोविंदपूर / प्रतिनिधी
कळंब आगारातून धाराशिवकडे जात असलेल्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने बुधवारी सकाळी गोविंदपूर येथे मोठा अपघात थोडक्यात टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.
ही घटना बुधवारी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या दरम्यान कळंब-ढोकी रोडवरील गोविंदपूर परिसरात घडली. कळंब आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ९७३१ ही कळंबहून धाराशिवकडे जात होती. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते.
दरम्यान, अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने वाहन अनियंत्रित होण्याची भीती निर्माण झाली. मात्र बस चालक एस. बी. शिंदे यांनी प्रसंगावधान राखत ब्रेकचा वापर करून बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितरीत्या थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
स्थानिकांच्या मते, बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत किंवा जवळील हॉटेलवर पलटी झाली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. चालकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य भीषण अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या घटनेनंतर एसटी बसच्या देखभाल व तांत्रिक तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नादुरुस्त बस प्रवाशांच्या सेवेत का धावतात, याबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून बसेसची नियमित तपासणी करूनच त्या रस्त्यावर सोडाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
