रावेर प्रतिनिधी, २ जुलै : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सध्या राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्याचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज
- २ जुलै (बुधवार) : दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
- ३ जुलै : अंशतः ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी
- ४, ५ आणि ६ जुलै : जिल्ह्यात विविध भागांत हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह एक-दोन सरी पडण्याची शक्यता
या काळात हवामानात काही प्रमाणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील इतर भागांतही पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट कायम
यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावत जिल्हावासीयांची प्रतीक्षा वाढवली होती. मात्र, ३० जूनअखेरपर्यंत काहीसा दिलासादायक चित्र समोर आले आहे. जून महिन्यात अधिकृत नोंदीनुसार अवघ्या सात दिवस पावसाची नोंद झाली असली तरी या सात दिवसांतच जूनच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तब्बल ६८ टक्के पाऊस झाला आहे.
तथापि, जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट कायम असल्याची नोंद करण्यात आली आहे.
पालघर आणि रायगडमध्ये शाळांना सुट्टी
कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे.
