तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहिले असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात सध्या केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. माग नक्षत्र कोरडे गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असून नगरपालिकेने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपरिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीटंचाईवर उपाय म्हणून रामदरा तलावातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी सर्व ठिकाणच्या गळती तातडीने बंद करण्यात येणार असून प्रत्येक नळाला तोटे बसविण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
पाणीपुरवठा सभापती यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना सांगितले की, “शहरवासीयांनी पाण्याचा योग्य आणि जपून वापर केला नाही, तर येत्या काही दिवसांत तुळजापूरला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.”
तीर्थक्षेत्र असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
