प्रतिनिधी | दि. १ जुलै
टेंभीखोडावे गावाजवळ सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांदरम्यान कोसळलेल्या मोरीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) वारंवार निर्देश देऊनही बुलेट ट्रेन प्रशासन आणि एल अँड टी कंपनीने तब्बल वर्षभर या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ऐन पावसाळ्यात कायमस्वरूपी मोरी बांधण्याऐवजी जुनी मोरी तोडून केवळ तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अल्प पावसातही या मार्गावरून पुराचे पाणी वाहू लागले असून मुसळधार पावसात हा तात्पुरता पूल व मार्ग वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी बुलेट ट्रेन प्रशासन आणि एल अँड टी कंपनी जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
या निष्काळजीपणाचा आगरी सेनेने तीव्र निषेध केला असून जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी मोरीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांसह तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आगरी सेनेकडून देण्यात आला आहे.

