रावेर प्रतिनिधी
निंभोरा सिम ते विटवा जाणाऱ्या मुख्य मार्गावरील भुई नदीवरील पूल अतिशय खराब अवस्थेत असून पुलावर मोठा खड्डा पडल्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पूल आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, पूल बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि मजूर वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असून हा मार्ग तब्बल १० ते १२ किलोमीटर लांब असल्याने वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना कामावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी शेतात जाणे कठीण झाले असून शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे “पूल दुरुस्तीचे काम नेमके कधी सुरू होणार?” आणि “वाहतूक पुन्हा कधी सुरळीत होणार?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पूल दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
