कागदपत्रे न दिल्याने भोवले; सीईओंकडून बडतर्फीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव
प्रतिनिधी | गेवराई :
गेवराई तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच राधा विष्णू पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. कर्तव्यात कसूर करणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करणे तसेच चौकशी समितीला सहकार्य न करता ग्रामपंचायतीचे अभिलेख उपलब्ध करून न दिल्याचा गंभीर ठपका ठेवत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39 (1) अन्वये पदच्युती (बडतर्फी) कारवाईसाठी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील रहिवासी संतोष नारायण जाधवर आणि रणजित लक्ष्मण नागरे यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी सरपंच राधा पिसाळ यांच्या कामकाजाविरोधात विभागीय आयुक्तांकडे गंभीर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने गेवराईचे गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गटविकास अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली चौकशी समिती सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयात तपासणीसाठी पोहोचली. मात्र, सरपंच राधा पिसाळ तसेच संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडून चौकशी समितीला आवश्यक शासकीय अभिलेख आणि कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यानंतर प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे 18 जून 2026 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विशेष सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सुनावणीदरम्यानही सरपंचांकडून कोणतेही अभिलेख अथवा त्यांच्या बाजूचे पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सरपंच राधा पिसाळ यांच्याविरोधात पदच्युतीची कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली असून, आता पुढील निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
