प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते जलमय झाल्याने कामावर जाणाऱ्या हजारो कामगार व नागरिकांची गैरसोय होत आहे.
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडत असून वाहनधारकांचे आर्थिक नुकसानही होत आहे. सकाळच्या वेळेत कामासाठी निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
चाकण हे औद्योगिक क्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो कर्मचारी विविध कंपन्यांमध्ये कामासाठी ये-जा करतात. मात्र पावसाळ्यातील अपुऱ्या पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेमुळे दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
