आळंदी | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने आळंदी परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
आळंदी शहरातील चारही पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेषतः सिद्धबेट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक भाग जलमय झाले आहेत.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
