पातूर प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील नवेगाव (चिखलवाड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी सकाळी संतापजनक प्रकार उघडकीस आला. शाळा सुरू होण्याची वेळ होऊनही शिक्षक वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटबाहेरच ताटकळत उभे राहावे लागले. सकाळी सुमारे १०:१० वाजेपर्यंत शाळेच्या मुख्य गेटला कुलूप असल्याने लहान विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या या निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेजवळून मुख्य रस्ता जात असल्याने अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे राहून शिक्षकांची वाट पाहत होते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सोमवार हा शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचा दिवस मानला जातो. मात्र अशा दिवशीही शिक्षक वेळेवर उपस्थित नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व शिकवणारे शिक्षकच वेळ पाळत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या प्रकाराची वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित शिक्षकांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे.
