लोहारा प्रतिनिधी
मौजे नागूर, ता. लोहारा, जि. धाराशिव येथे मागील काही महिन्यांपासून येणाऱ्या एस.टी. बसच्या अनियमित आणि ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही उमरगा आणि लोहारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
एस.टी. बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. परीक्षांना उशीर होणे, वर्ग चुकणे तसेच शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार कै. के. वाय. जाधव (आण्णा) यांच्या प्रयत्नांमुळे पूर्वी नागूर गावासाठी एस.टी. बसचे वेळापत्रक अत्यंत शिस्तबद्ध होते. बस वेळेवर येत-जात असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र त्यांच्या निधनानंतर नागूर गावातील एस.टी. सेवेचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
या अनियमिततेमुळे ग्रामस्थांना शैक्षणिक, आर्थिक तसेच वैद्यकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य परिवहन महामंडळ करणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ९ वाजता, सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता नागूर गावात एस.टी. बस येणे अपेक्षित आहे. मात्र विशेषतः रात्री मुक्कामी येणारी बस ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून एस.टी. बसचे नियोजन सुरळीत करावे, तसेच सर्व बसगाड्या वेळापत्रकानुसार चालवाव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा नागूरसह परिसरातील नागरिक मोठे जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
