दापोली | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी दापोली पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
“आपली सुरक्षितता, आमची जबाबदारी” या संदेशासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या जनजागृती पत्रकाद्वारे दापोली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन व अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सखल भागातील नागरिकांनी वेळेवर सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तू जवळ ठेवाव्यात, तसेच विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याच्या प्रवाहात जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही दापोली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी दापोली पोलीस स्टेशन 24×7 सेवेसह सज्ज असून मदतीसाठी 9684708307 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत असून, आपत्तीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
