महाड प्रतिनिधी :
महाड तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे महाड शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाड शहरातील सावित्री नदी तसेच परिसरातील अनेक नदी-नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. शहरातील बाजारपेठा, रहिवासी संकुले आणि सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक दुकानांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पूराच्या पाण्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
“जर असाच पाऊस सुरू राहिला तर सर्वसामान्य नागरिकांचे हाल अधिक वाढतील,” अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच पूरस्थिती ओसरल्यानंतर शहरात रोगराई पसरू नये यासाठी नगरपालिका प्रशासन कोणत्या उपाययोजना करते, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
