पंढरपूर | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला असून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानालाही पुराचा फटका बसत आहे. पुणे परिसरातील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, या पावसाचा सकारात्मक परिणाम मात्र सोलापूर जिल्ह्यावर दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली असून सध्या धरणात सुमारे २८ हजार ७०० क्युसेस पाणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. धरणाची पाणीपातळी सध्या मायनस २८ वर असली तरी येत्या दोन दिवसांत ती प्लस स्तरावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस नसतानाही धरणात सुरू झालेल्या पाण्याच्या वाढत्या आवकेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील वाढता जलसाठा शेतीसाठी फायदेशीर ठरणार असून भविष्यातील पाणीटंचाईचा धोका काही प्रमाणात कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
