खारपाडा प्रतिनिधी :
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खारपाडा-सावरोली रोडवरील खारपाडा गावातील पूर्वेकडील समर्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांच्या घराजवळील भागातून पाणी वाहत असल्याने नागरिकांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही गंभीर परिस्थिती पाहून समाजसेवक पत्रकार कैलासराजे घरत आणि तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान बाबू घरत यांनी तातडीने पुढाकार घेतला. प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतः कुदळी-फावडे हातात घेत रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेतले.
दोघांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून रस्त्यावर साचलेले पाणी नाल्याकडे वळविले. त्यांच्या या तातडीच्या आणि सकारात्मक प्रयत्नांमुळे रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली निघाला असून वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले असून, संकटाच्या वेळी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन काम करणाऱ्या या समाजसेवकांचे अभिनंदन केले जात आहे.
