पेण प्रतिनिधी :
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील ठाकूरपाडा, दुष्मी आणि खारपाडा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाताळगंगा नदीने धोकादायक पातळी गाठल्याने परिसर जलमय झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पत्रकार कैलासराजे घरत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.
पाहणीदरम्यान ठाकूरपाडा गावातील श्री. मनोहर शंकर ठाकूर आणि गिरीश वामनराव घरत यांच्या घरात तब्बल २ ते ३ फूट पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. तसेच ठाकूरपाडा तळे परिसरातील वासुदेव रामा ठाकूर यांच्या घरातील स्वयंपाकघरातही सुमारे ३ फूट पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी पत्रकार कैलासराजे घरत यांनी पूरग्रस्त नागरिकांना धीर देत, “आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही मदत लागल्यास तात्काळ संपर्क साधा. आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत,” असे आश्वासन दिले.
या दौऱ्यादरम्यान आत्माराम ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, सागर लक्ष्मण ठाकूर, हिरामण मोरे, नरेंद्र मोरे, विश्वास ठाकूर, माजी सदस्य श्रीमती सुजाता ठाकूर तसेच दुष्मी येथील मधुकर पांडुरंग ठाकूर, कृष्णा घरत, वसंत पांडुरंग ठाकूर आणि खारपाडा गावातील बाळकृष्ण गणपत घरत, शाम गणपत घरत, सुहास बाळकृष्ण घरत, सुबोध अनंता घरत आदी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
बातमीचे मुख्य मुद्दे :
- ठिकाण: ठाकूरपाडा, दुष्मी व खारपाडा, ता. पेण
- पाहणी: पत्रकार कैलासराजे घरत व ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत यांनी पूरग्रस्त भागाची भेट घेतली
- नुकसान: अनेक घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी शिरले
- मागणी: प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी
- दिलासा: नागरिकांना मदतीचे आश्वासन
