पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून त्याचा फटका पिंपरी कॅम्प परिसरातील नदीकाठच्या वस्त्यांना बसला आहे. पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पूराच्या पाण्यामुळे घरातील धान्य, खाण्यापिण्याच्या वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच अन्य घरगुती साहित्य खराब झाले असून अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली विस्कळीत झाली असून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पूरग्रस्त नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी तसेच आवश्यक जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


