दापोली | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः कशेडी घाट, खेड, चिपळूण तसेच इतर संवेदनशील आणि पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
कशेडी घाटात वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. धोकादायक ठिकाणी सतर्कतेचे फलक उभारण्यात आले असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
खेड शहरात जगबुडी नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या परिसराची पाहणी करत त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या आपत्कालीन साहित्याची पाहणी करण्यात आली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी बचाव व मदतकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
संकटाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

