खटाव | प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील निमसोड गावात अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था कायम असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणारे निमसोड गाव जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर विविध पदांवर प्रतिनिधित्व करणारे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की नागरिकांना चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गावातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
