कळंबोली | प्रतिनिधी
कळंबोली येथील सेक्टर-८ ई, प्लॉट क्रमांक ११ परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मंगळवारी मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. लक्ष्मी डेव्हलपर्स व वेल्किन बिल्डर्स यांच्या वेल्किन हायट्स प्रकल्पासाठी उभारण्यात आलेली सुमारे २० फूट उंच संरक्षक लोखंडी पत्र्यांची भिंत अचानक कोसळून शेजारील हेरंब सोसायटीच्या आवारात पडली. या घटनेत अनेक दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेत सोसायटीची संरक्षक भिंतही कोसळली असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे माती खचल्याने आणि संरक्षक भिंतीसाठी आवश्यक मजबूत पाया न घातल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लोखंडी अँगल थेट मातीमध्ये बसविल्याने संपूर्ण संरचना कोसळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका विद्या गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची तसेच नुकसानग्रस्त वाहनधारकांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
दरम्यान, पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिसर सुरक्षित केला असून दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर निवासी भागालगत सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.



