रावेत | प्रतिनिधी :
रावेत परिसरातील देहूरोड महावितरण विभागाच्या कार्यक्षेत्रातील अनेक निवासी सोसायट्यांमध्ये गेल्या ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ ते २५ मजली उंच इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे वास्तव्यास असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची संख्या मोठी आहे.
वीजपुरवठा बंद असल्यामुळे लिफ्ट सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून ज्येष्ठ नागरिकांना जिन्याने ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, इंटरनेट सेवा आणि इतर अत्यावश्यक सुविधांवरही परिणाम झाला आहे. वाढत्या उकाड्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
रावेत येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते निलेश भोसले यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच वीज खंडित होण्यामागील नेमके कारण आणि वीजपुरवठा पूर्ववत कधी होणार याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना कराव्यात, वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.



