अमरावती | प्रतिनिधी :
प्रसिद्ध कथाकार डॉ. रवी दलाल यांच्या साहित्याचा वेध घेणाऱ्या ‘रवी दलाल यांच्या निवडक कथा’ या कथासंग्रहाचे नागपूर येथे प्रकाशन संपन्न झाले. या कथासंग्रहाचे संपादन लेखक विभूतीचंद्र गजभिये यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह, लष्करीबाग येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे होते, तर उद्घाटक म्हणून डॉ. लालसिंग मिसाळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना ई. झेड. खोब्रागडे म्हणाले की, “समाजव्यवस्थेने नाकारलेल्या शेवटच्या घटकांतील माणूस हा रवी दलाल यांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या कथा सामाजिक भान जपणाऱ्या असून उपेक्षितांचा आवाज बुलंद करणाऱ्या आहेत. सध्याच्या काळात साहित्यिकांनी संविधानवादी भूमिका घेत सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.”
कार्यक्रमात डॉ. रवी दलाल, बाळासाहेब काळे (निवृत्त उपसंचालक, भूमिअभिलेख), प्रबोधनकार अशोक सरस्वती, रामभाऊ डोंगरे, विकास राऊत, प्रा. वीरेन्द्रबाबू इंगळे, डॉ. भन्ते अभयनायक, डॉ. कृष्णकांत डोंगरे तसेच लेखक व संपादक विभूतीचंद्र गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. शोभा पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, तर प्रा. वीरेन्द्रबाबू इंगळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.
यावेळी कथाकार डॉ. रवी दलाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमध्ये विखुरलेल्या कथा एकत्र करून त्यांना पुस्तक स्वरूप देण्याचे श्रेय विभूतीचंद्र गजभिये यांना जाते. त्यांच्या सामाजिक जाणिवेची आणि साहित्यनिष्ठेची त्यांनी प्रशंसा केली.
प्रबोधनकार अशोक सरस्वती यांनीही विभूतीचंद्र गजभिये यांच्या सामाजिक कार्याचा व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.
समारोपात ई. झेड. खोब्रागडे यांनी रवी दलाल यांच्या कथा परिवर्तनवादी विचारांना बळ देणाऱ्या असून सामाजिक आणि धार्मिक जागृती घडविण्याची ताकद त्यांच्यात असल्याचे सांगितले. तसेच या कथा वाचकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले.
उत्तरपर भाषणात विभूतीचंद्र गजभिये यांनी साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून जागृत लेखकाची समाजातील घडामोडी मांडण्याची जबाबदारी असते, असे सांगितले. या कार्यात पत्नी दर्शना यांच्या सहकार्यामुळेच हे काम पूर्णत्वास नेऊ शकलो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सागर भवते यांनी केले, तर प्राचार्य वसंत वावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला साहित्य, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.



