श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
केंद्रस्तर विशेष शिक्षक भानुदास शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खेडकर आणि उपप्राचार्य बापूसाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भानुदास शिंदे म्हणाले, “वृक्ष हे मानवाचे खरे मित्र आहेत. शुद्ध हवा, सावली, फळे आणि फुले यांची अमूल्य देणगी वृक्षांकडून मिळते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.”
दिव्यांग विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी केला. वृक्षारोपणामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होते, हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्यांग विभाग प्रमुख श्वेता दैवज्ञ, सतीश ओहोळ, अरुण रुपवते आणि अजयकुमार मरकड यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.
