नाशिक | प्रतिनिधी :
नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बुधवारी प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद आणि कार्बन नाका परिसराची भर पावसात प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे पाणी साचण्याच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी घटनास्थळी जाऊन जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला.
मखमलाबाद आणि कार्बन नाका परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्तांनी पावसातच पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेतली.
पाहणीनंतर संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. गाळ, माती व इतर अडथळे त्वरित हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच भविष्यात अशा समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
यावेळी आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, “पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही महापालिका प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. समस्या समोर आल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आणि भविष्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाचा भर आहे.”
महापालिका प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
