शिरपूर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘देववृक्ष अभियान’ अंतर्गत अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन वृक्षारोपण व मोफत रोपवाटप करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत. हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडविण्याचा सामाजिक संकल्प असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृतीत वृक्षाला देवतुल्य स्थान दिले गेले आहे. मानवाला शुद्ध हवा, सावली, फळे आणि पर्यावरणाचा समतोल देणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, हा संदेश या अभियानातून दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘देववृक्ष’ ही संकल्पना समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अनुलोमचे कार्यकर्ते करत आहेत.
शिरपूर परिसरातील अनुलोमचे जनसेवक मनोज गिरासे हे मोटारसायकलवर रोपे घेऊन गावोगावी फिरत नागरिकांना रोपांचे वाटप करत आहेत. पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पर्यावरण जनजागृतीची धुरा खांद्यावर घेतली असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अभियानाचा उद्देश केवळ झाडे लावणे नसून प्रत्येक नागरिकामध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा आहे. आज लावलेली ही रोपे भविष्यात मोठी होऊन समाजाला शुद्ध हवा, सावली आणि पर्यावरणाचे संरक्षण देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस, सामाजिक कार्यक्रम आणि विविध प्रसंगी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले असून, “देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें” हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच समाजात सकारात्मक विचारांचीही रुजवात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
