दापोली | प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील गावरई, तेरेवायंगणी, उंबर्ले, ओळगाव, नानटे आणि किनल या सहा गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (८ जुलै) रात्री दापोली येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर महावितरणने उद्यापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.
सलग पाच दिवस वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे. शेतीची कामे ठप्प झाली असून लघुउद्योजक आणि व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत अखेर सहाही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात दाखल झाले.
रात्री सुमारे ९ ते १०.३० या कालावधीत ग्रामस्थ आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दापोली पोलीस घटनास्थळी तैनात होते.
चर्चेनंतर महावितरण प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथके कामाला लागल्याची माहिती देत उद्यापर्यंत सहाही गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
मात्र, दिलेल्या मुदतीत वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर सहाही गावांतील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या घटनेमुळे दापोली तालुक्यातील वीजपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महावितरण प्रशासन आपल्या आश्वासनाची पूर्तता करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
