नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढत असल्याने हा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना नदीपात्रात किंवा किनाऱ्यालगत ठेवलेले साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
