निफाड | प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.

राज्याचे कृषी व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी रामकुंड परिसराला भेट देत पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीतील पाण्याची आवक वाढत असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदीपात्रात जाणे टाळण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
