पेण | प्रतिनिधी :
पेण तालुक्यातील तांबडशेत–जोहे रस्त्यावर नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने शेतामधून पाणी रस्त्यावर येत असून वाहनचालक आणि नागरिकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर काहीसा कमी असतानाही नदीतील वाढलेल्या पाण्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे.
रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, नागरिकांनीही पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
