गंगापूर | प्रतिनिधी
गंगापूर–लासूर मार्गावरील रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने विद्यार्थी, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण रस्ता, चिखल आणि वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवास त्रासदायक बनला आहे.

विशेषतः शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज उशीर होत असून त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम होत आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
अनेक वेळा बस व इतर वाहने चिखलात अडकत असल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित विभागाने रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
