फलटण | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव–साखरवाडी परिसरात आज (गुरुवारी) सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५) हे घरातील बल्ब काढत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी गंगो सतीश शिंदे (वय ४०), मुलगा सचिन शिंदे (वय २५) आणि सून आरती शिंदे (वय २३) यांनाही विजेचा धक्का बसला.
या भीषण दुर्घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नेमकी घटना कशी घडली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
