हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. धक्के जाणवताच अनेक नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर आले.
प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरळी गावाजवळ जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जात आहे. शिरळी, पांगरा शिंदे, कुरुंदा तसेच परिसरातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही ठिकाणी भांडी, खिडक्या आणि घरांची छपरे हलल्याचे नागरिकांनी सांगितले.
या भूकंपाचे धक्के शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांतही जाणवल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिरळी व पांगरा शिंदे परिसरातील काही जुन्या घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याचे वृत्त आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, औंढा तालुक्यातील आसोला येथेही नागरिकांना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
