रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहरातील अनेक भागांमध्ये साचलेले घाण पाणी, तुंबलेल्या नाल्या आणि कचऱ्याचे ढिग यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपरिषदेच्या साफसफाई व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक नाल्यांची गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा साचून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून डासांच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील विविध भागांत स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नाल्यांची साफसफाई, कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी नगरपरिषदेने शहरातील स्वच्छता व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
